Friday, October 26, 2018

शिव-शंभू पन्हाळा भेट

स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवराय आणि स्वराज्य रक्षक शिवरौद्र शंभूराजे यांची ऐतिहासिक पन्हाळा भेट..
यानिमित्त सुचलेल्या काही.... 
काव्यपंक्ती
शिव शंभू सेवेस अर्पण...

हि भेट न्हवती केवळ पिता पुत्राची..
तर हि भेट होती ती - एका मध्यान्हीच्या तळपत्या सूर्याची आणि संघर्षमय ढगांमागून उगवणाऱ्या एका तांबड्या, तेजोमय, आणि अखंड तेजस्वी सूर्योदयाची...!

हि भेट न्हवती केवळ राजा आणि राजपुत्राची..
तर हि भेट होती ती - सर्व काही सामावून घेऊन संथ वाहणाऱ्या नदीची आणि उंच डोंगरावरून बेदरकार, बेफाम कोसळणाऱ्या रौद्र धबधब्याची... !

हि भेट न्हवती केवळ वीर पराक्रमी योध्यांची.
तर हि भेट होती ती - स्वराज्याचे स्वप्न साकारणाऱ्या मासाहेबांच्या शिवबाची आणि लहान वयातच मातृछत्र हरपणाऱ्या शंभू बाळाची... !

हि भेट न्हवती केवळ स्वराज्य वीरांची..
तर हि भेट होती ती - स्वराज्याची शपथ घेऊन परकीय आक्रमणांशी झुंजणाऱ्या वाऱ्याची आणि ह्याच वाऱ्याची प्रेरणा घेऊन शत्रूचे मनसुभे उधळवून लावणाऱ्या वादळाची... ! 

हि भेट न्हवती केवळ बाप लेकाची.. 
तर हि भेट होती ती - सह्याद्रीच्या कडेकपाऱ्यातुन दिल्लीपर्यंत सिंहगर्जना करणाऱ्या सिंहाची आणि आपल्या पराक्रमाने दिल्ली हादरवून सोडणाऱ्या छाव्याची...!

हि भेट न्हवती केवळ दोन युगपुरुषांची..
तर हि भेट होती ती - स्वराज्य निर्मितीचे स्वप्न उराशी बाळगणाऱ्या एका विस्तवाची आणि त्या विस्तवाने प्रजवलीत झालेल्या तेजोमय मशालीची...!
 
हि भेट न्हवती केवळ दोन अद्वितीय व्यक्तिमत्वांची ..
तर हि भेट होती ती - स्वाभिमानाने जगावे कसे हे दाखवणाऱ्या शिवरायांची आणि स्वराज्य रक्षणाकरिता मरावे कसे हे दाखवणाऱ्या शूरवीर, शिवरौद्र शंभूराजांची...!

धन्य आहोत आम्ही की आम्हाला शिव-शंभुं ची ऐतिहासिक अशी पन्हाळा भेट स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेमुळे पहायला मिळाली..!

कलाकारांचे करावे तेवढे कौतुक कमीच..!!
हे शिवधनुष्य उत्तमरीत्या पेलल्याबद्दल डॉ. अमोल कोल्हे आणि श्री. शंतनू मोघे यांचे मनःपूर्वक आभार..!!
तुम्हा दोघांमध्ये स्वराज्य संस्थापक आणि स्वराज्य रक्षक दिसतात..!!

विनय दिलीप मांडगे.

Wednesday, October 10, 2018

स्वराज्याचे वास्तूविशारद - हिरोजी इंदुलकर

हिरोजी इंदुलकर..

आपण सर्वांना हे नाव चांगलच परिचित असेल...

छत्रपती शिवरायांचे बांधकाम विभाग प्रमुख म्हणजे हिरोजी..
महाराजांचे निस्सीम भक्त आणि उत्तम कलाकार म्हणजे हिरोजी..
आजच्या सिव्हिल इंजिनियर ला लाजवणारे बांधकाम कौशल्य म्हणजे हिरोजी...

तर आज जाणून घेऊया हिरोजींबद्दल...

महाराजांनी सुरतेच्या स्वारीवर निघण्याच्या आधी हिरोजींच्या हाती मोहरा दिल्या आणि राजे स्वारीवर निघून गेले...
१६५६ साली हिरोजींनी किल्ल्याचे बांधकाम सुरु केले...  त्यांनी उराशी एकच स्वप्न बाळगल होत, आणि ते म्हणजे महाराजांच्या पराक्रमाला शोभेल अशी भव्यदिव्य राजधानी उभारायची...
झालं तर मग किल्ल्याच्या बांधकामाला झपाट्याने सुरुवात झाली... आणि हा हा म्हणता तब्बल १४ वर्ष बांधकाम करून हि स्वराज्याची अभेद्य राजधानी १६७० ला दिमाखात उभी राहिली..

यात मुख्यत्वे करून अष्टप्रधान कार्यालय, धान्याची कोठारं, राणीवसा, गंगासागर, शिरकाई देवी मंदिर, अजय विजय बुरुज, टकमक टोक, बाजार पेठ, राज दरबार, वापी-कूप-तडाग, प्रासाद, उद्याने, राजपथ, स्तंभ, गजशाला, नरेंद्रसदन, बारा महाल, नगारखाना, होळी मैदान, बारुदखाना, जगदीश्वर मंदिर अश्या अनेक वास्तू हिरोजींनी रायगडावर उभ्या केल्या...
एकंदर सांगायचं म्हणलं तर रायगडावर ३५० इमारती, ११ तलाव, ८४ पाण्याच्या टाक्या आहेत ..

ह्या हिंदवी स्वराज्याचे स्वप्न उराशी बाळगून, त्यासाठी परकीय आक्रमणांशी झुंझ देऊन रयतेचं राज्य उभ्या करणाऱ्या छत्रपती शिवरायांची राजधानी देखील महाराजांच्या अद्वितीय पराक्रमाला शोभेल अशीच असावी ह्या एकाच उद्धेशाने हिरोजींनी ह्या वास्तूच्या बांधकामावेळी पैश्याची कुठलीही कमतरता भासू नये ह्या साठी आपली वडिलोपार्जित जमीन जुमला, घर सर्व काही विकून हा भव्य दिव्य अभेद्य असा रायरीचा डोंगर - डोळ्यांना दिपवणाऱ्या सौंदर्ययुक्त पण तितकाच राकट, रांगडा असा रायगड १४ वर्षात उभा केला ... 

महाराजांपर्यंत संदेश पोहचला आणि महाराज रायगड पाहण्यासाठी गडावर दाखल झाले..
हिरोजींच्या बांधकाम कौशल्याने सजलेला आणि परिपूर्ण असा रायगड पाहिल्यावर महाराज हिरोजींवर भलतेच खुश झाले..

रायगडाचे वर्णन एका वाक्यात सांगताना हिरोजी सांगतात  ...
"परवानगीविना गडाखालून एकच गोष्ट वर येऊ शकते, ती म्हणजे वारा"
आणि गडावरून एकच गोष्ट खाली जाऊ शकते, ती म्हणजे पाणी"

हे ऐकून आणि सर्वार्थाने परिपूर्ण अश्या रायगडाची भव्यदिव्य कलाकृती पाहून महाराजांनी हिरोजींना बक्षीस, ईनाम म्हणून काहीतरी मागण्याचा आग्रह धरला..
त्यावर हिरोजींनी आदरपूर्वक विनंती केली कि - गडावर असणाऱ्या जगदीश्वर मंदिराच्या पायरीवर माझं नाव असावं अशी माझी इच्छा आहे..

या मागचं कारण विचारल्यावर हिरोजींनी त्याच स्पष्टीकरण दिल -

"महाराज तुम्ही जेव्हा जेव्हा गडावर असाल, तेव्हा तेव्हा जगदीश्वराच्या दर्शनाला नक्की याल"
आणि आल्यावर प्रत्येक वेळी तुमच्या पायाची धूळ आमच्या मस्तकी लागावी एवढीच आमची इच्छा आहे"

हे ऐकून हिरोजींची महाराजांप्रती असणारी निस्सीम भक्ती, सेवाभाव पाहून सदरावरील सगळ्यांचाच ऊर भरून आला...
महाराजांनी लागोगाल हिरोजींना परवानगी दिली आणि नुसतीच परवानगी न देता त्यावर खालील मचकूर लिहण्यास सांगितले..

 "सेवेचे ठायी तत्पर.. हिरोजी इंदुलकर "




आपण आज हि जाऊन पाहू शकतो कि, महाराजांच्या समाधी कडून जगदीश्वराच्या मंदिराकडे जाताना आपल्याला - हि भक्तीची, निष्ठेची, सेवेची पायरी आजही  आपल्या सगळ्यांच्या पायाची धूळ मस्तकी लावून घेत... त्याच जोमात, जोशात आपल्या कौशल्याची आणि महाराजांप्रती असणाऱ्या निस्सीम भक्तीची , सेवाभावाची जाणीव करून दिल्याशिवाय राहत नाही...

अश्या स्वराज्याचे वास्तुविशारद आणि आपल्या कौशल्याने अभेद्य, ताकदवान, आणि रौद्र अशी स्वराज्याची राजधानी घडवणाऱ्या हिरोजींना त्रिवार मुजरा..!! 


Monday, May 7, 2018

किल्ले रायगड - इतिहास व हिरकणी बुरुजाची कहाणी..

मित्रांनो,
आपल्या हिंदवी स्वराज्याची राजधानी म्हणजेच किल्ले रायगड आणि गडाची भव्यता.. मी माझ्या ब्लॉगच्या रूपातून तुमच्या समोर घेऊन येतोय...
आशा करतोय कि हि शृंखला तुम्हाला नक्कीच आवडेल...
आणि ही माहिती आवडण्याबरोबरच आपला हा देदीप्यमान इतिहास अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावा आणि आपल्या "स्वराज्य राजधानीच्या" विविध पैलूंचं दर्शन आपल्याला, आपल्या मातृभाषेत घडावं हीच त्यामागची प्रेमळ भावना...

तर आजचा भाग क्र. १ :- रायगडाचा इतिहास हिरकणी बुरुजाची कहाणी...

रायगडाचं भव्य स्वरूप नुसतं सांगण्यापेक्षा ते प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अनुभवायला हवंच...
समुद्रसपाटीपासून २८५१ फूट उंचीवर वसलेला आणि १२०० एकर मध्ये विस्तीर्ण असा पसरलेला भव्य असा रायरीचा डोंगर म्हणजे "किल्ले रायगड"

गडाच्या खालून पाहणारा चुकूनही कल्पना करणार नाही कि एवढ्या उंचीवर अश्या डोंगरामध्ये एखादा किल्ला असू शकतो... हे ह्या किल्ल्याच सर्वात मोठं वैशिष्ठ्य ...

आणि ह्याच कारणामुळे महाराजांनी रायगडाला स्वराज्याची राजधानी बनवण्याचे ठरवले...
महाराजांच्या जीवनात ३ किल्ल्यांचे मोठे योगदान आहे,
त्यात प्रथम किल्ला म्हणजे महाराजांचा जिथे जन्म झाला तो "किल्ले शिवनेरी"..
त्या नंतर महाराजांनी पहिली राजधानी म्हणून ज्या किल्ल्याची निवड केली असा - आणि आज देखील किल्ला पाहताना अंगावर काटा येईल असा म्हणजे "किल्ले राजगड"..
आणि नंतर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला आणि सर्वार्थाने परिपूर्ण असा रायरी चा डोंगर म्हणजेच "किल्ले रायगड"..

इतिहास -
जावळीचे मोरे यांच्या तावडीत असलेला हा रायरीचा डोंगर महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी वेढा घालून जिंकला..
सह्याद्री च्या पर्वतरांगांमध्ये वसलेला अभेद्य असा डोंगर, त्याच बरोबरीने आपल्या इतर किल्ल्याची देखरेख सहज रित्या शक्य असल्याने व त्याचे भौगोलिक महत्व
आणि चढाई करण्ययसाठी अवघडं व सागरी मार्गाने दळणवळण करण्यासाठी देखील सोपे असल्याने महाराजांनी ह्या रायरीच्या डोंगराची निवड स्वराज्याची राजधानी म्हणून करण्याचे ठरवले...

महाराजांनी किल्ला बांधणी साठी निवड केली ती म्हणजे वास्तुविशारद (Architect) हिरुजी इंदुळकर यांची...

महाराजांनी हिरोजींच्या हाती मोहरा दिल्या आणि राजे सुरतेच्या स्वारीवर निघून गेले...
हिरोजींनी किल्ल्याचे बांधकाम १६५६ ला सुरु करून १६७० ला पूर्ण केले. आणि १४ वर्षात हि स्वराज्याची अभेद्य राजधानी दिमाखात उभी केली..
आपण नुसता रायगड फिरायचो म्हणलो तरी आपल्याला पूर्ण गड बघण्यासाठी कमीत कमीत ३ दिवस लागतात..
ह्या रायगडावर एकूण मिळून ३५० इमारती, ११ तलाव, ८४ पाण्याच्या टाक्या आहेत...
ह्यामध्ये महत्वाची ठिकाण म्हणजे अष्टप्रधान कार्यालय, धान्याची कोठारं, राणीवसा, गंगासागर, शिरकाई देवी मंदिर, अजय विजय बुरुज, टकमक टोक, बाजार पेठ, राज दरबार, नगारखाना, होळी मैदान, बारुदखाना, जगदीश्वर मंदिर आणि शिवसमाधी...
गडावर जाण्यासाठी २ मार्ग आहेत..
पहिला म्हणजे जो आपण सर्वजण निवडतो तो - अर्थातच "रोप वे"
आणि दुसरा म्हणजे जो मूळ जुना मार्ग आहे तो ..

जुन्या मार्गाने गडावर जाण्यासाठी १४३५ पायऱ्या आहेत आणि हे पूर्ण अंतर ३.५ किमी एवढे भरतं....

आपण रोप वे ने ज्या जागेवर जाऊन पोहोचतो ती गडाची मागची बाजू. तिथल्या बुरुजाला हिरकणी बुरुज असं म्हणतात...

त्याची देखील एक ऐतिहासिक, रोमांचक कहाणी आहे...

गडाच्या पायथ्याला एक हिरा नावाची महिला राहायची. दैनंदिन उदरनिर्वाहासाठी ती दूध, भाजीपाला वगैरे विकण्यासाठी गडावरील बाजारपेठेत येत असे.
हा तिचा कार्यक्रम नित्याने चालू असायचा.
एक दिवस झालं असं कि सूर्यास्त झाल्यावर नागरखान्यातले ढोल वाजू लागले.. आणि किल्याचे सर्व दरवाजे बंद झाले.

हा गडावरचा नियमच असल्याने द्वारपाल देखील त्यांचे काम चोख पद्धतीने करत होते... मग भलेही समोरची व्यक्ती कोणीही असो...
सूर्यास्त झाल्यावर कोणालाही गडाबाहेर पडणे अशक्य च होते आणि सूर्योदयापर्यंत वाट पाहण्याखेरीज दुसरा कोणताही पर्याय न्हवता...

हिरा गडावर अडकली.. तिने खूप विनवणी करून देखील कोणी काही ऐकेना... द्वारपालांनी सूर्योदयापर्यंत वाट पाहण्याची विनंती केली आणि हिराची राहण्याची सोय करून दिली..
पण हिराला काही केल्या चैन पडेना, तिला डोळ्यासमोर दिसत होत ते फक्त तीच २ वर्षाचं तान्ह बाळ...
झालं तर मग, हिरा ने मनाशी ठरवलं व  निश्चय केला आणि तिच्या तान्ह्या लेकरासाठी तिने गड उतरायचं ठरवलं...

पाहता पाहता हिरा गड उतरली आणि तिच्या लेकराजवळ पोहोचली...

दुसऱ्या दिवशी हि बातमी महाराजांपर्यंत पोहोचली. महाराजांनी लागोलाग हिरा ला गडावर बोलावणं धाडलं....

हिरा तिच्या तान्ह्या लेकरासहित गडावर हजर झाली... तिने घडलेला सारा प्रकार महाराजांना सांगितला..
महाराजांनी हिराला फक्त एक विनंती केली.
कि, आदल्या दिवशी ज्या प्रमाणे ती गड उतरून गेली त्या प्रमाणे एकदा गड उतरवून दाखवण्यास सांगितले...

त्यावेळी हिरा ने जे उत्तर दिले त्याने सारा दरबार गहिवरून गेला.... हिरा चं उत्तर होत....

"राजे काल जेव्हा मी हा गड उतरून चालले होते, तेव्हा मला माझ्या तान्ह्या लेकराशिवाय बाकी काहीच दिसत न्हवत..
आज मी हा गड उतरू शकत नाही कारण माझं लेकरू माझ्या जवळ आहे आणि उतरण्याचा विचार केला तरी मला समोर दिसतोय तो केवळ हा भयाण डोंगर...."

हिराच्या उत्तराने महाराज देखील स्तब्ध झाले आणि राजांनी हिरा चा साडी चोळी, खणा नारळाने ओटी भरून यथोचित सन्मान केला..

आणि महाराजांच्या लक्षात आलं.. कि काल जसा हिरा ने गड उतरला त्या प्रकारे शत्रू देखील ह्या मार्गाने गडावर दाखल होऊ शकतो.....
राजांनी लागोलाग हिरोजींना बोलवून घेतले आणि हिरा ज्या बुरुजावरून खाली उतरली त्या बुरुजाची डागडुजी करून घेण्यास सांगितले आणि त्याला "हिरकणी बुरुज" हे नाव दिले...

आपण रोप वे ने ज्या जागी जाऊन पोहोचतो, तिथेच आहे हा ऐतिहासिक आणि अजरामर "हिरकणी बुरुज"...!!

क्रमश:


फोटो सौजन्य - गुगल

Friday, March 23, 2018

ध्येयाने झपाटलेला माणूस..

आज तुमच्यासमोर आणतोय, कहाणी एका ध्येय वेड्या माणसाची.... 

हि गोष्ट आहे बुलढाणा जिल्ह्यातील, जळगाव जामोद तालुक्यातल्या काजेगाव मधील श्री. विजय वाघ यांची..!

विजय यांची काजेगाव मध्ये वडिलोपार्जित ८.५ एकर जमीन, ज्यातील बहुतांशी म्हणजे ७ एकर जिरायती आणि उर्वरित १.५ एकर बागायती जमीन.. 
वडील वीज कंपनीतून सेवानिवृत्त, भाऊ व्यवसायानिमित्त अमरावती ला स्थायिक.. व स्वतः विजय देखील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पुणे येथे नोकरीस.. 
दोन्ही मुले बाहेरगावी असल्यामुळे पारंपरिक शेती पद्धतीने सोयाबीन, उडीद, ज्वारी, तूर अश्या पिकांच्या लागवडीवर वडिलांचा भर होता. पण यातून फारच जेमतेम उत्त्पन्न हाती येत असे.. 

ह्या सगळ्या परिस्थितीकडे पाहून विजय यांनी निर्धार केला.. आणि हि स्थिती बदलायचं ठरवलं... 
पारंपरिक शेती करण्याबरोबरच त्यांनी शेतीपूरक व्यवसाय करायचं ठरवलं.. 
मग सुरु झाला तो अभ्यास.. बाजारपेठेचा पाठपुरावा करून त्यांनी शेती ला जोडधंदा विकसित करण्याची खूणगाठ मनाशी बांधली..

आणि हे सगळं सुरु करण्यासाठी आर्थिक भांडवल आवश्यक होत.. ते उभं करण्यात त्यांना साथ दिली ती त्यांची खंबीर पत्नी सौ. योगिता यांनी.. त्याच बरोबरीने त्यांचे मित्र देखील यासाठी धावून आले... 

त्यांची पत्नी सौ. योगिता यांचे योगदान फार अमूल्य आहे.. विजय यांच्या संकल्पनेतील ऍग्रो फार्म सत्यात उतरवताना ज्या अडचणी आल्या त्यावेळी योगिता यांनी कायम त्यांचं मनोधैर्य खचू न देण्याची काळजी घेतली आणि हे शिवधनुष्य लिलया पेलण्यास विजय यांना बळ दिले.. 

झालं तर मग.. सर्वप्रथम त्यांनी शेळीपालन सुरु करायचं ठरवलं.. 
विजय हे नोकरी निमित्त पुण्यात असल्याने आपल काम "उंटावरून शेळ्या हाकणे" ह्या उक्तीस बळी पडू नये ह्यासाठी गावी व्यवस्थापन करण्यासाठी श्री. सिद्धार्थ यांची मदत घेतली.. व दैनंदिन कामासाठी २ कायम स्वरूपी मजुरांची नेमणूक केली.. 
घराजवळील क्षेत्रामध्ये त्यांना अभियंते असलेल्या मोठ्या बंधूंचे सहकार्य लाभले..  त्यांनी उपलब्ध साहित्याच्या मदतीने शेळीपालनासाठी बंदिस्त गोठा बांधला.. 
त्यानंतर विजय यांनी परिसरातील स्थानिक जातीच्या २० शेळ्यांपासून ह्या व्यवसायास सुरुवात केली.. हळूहळू व्यवस्थापन करून त्यांनी या क्षेत्रातील मान्यवर मंडळींचं मार्गदर्शन घेऊन शेळ्यांची योग्य ती निगा राखली आणि पुढे जाऊन शेळ्यांची संख्या ७८  वर नेली... 
आजूबाजूचे गावकरी, व्यापारी यांनी गोठ्यात येऊन शेळ्यांची खरेदी करणे सुरु केले.. आणि पाहता पाहता गुणवत्तेनुसार शेळ्यांना ७५०० ते १२००० असा दर मिळू लागला...



शेळीपालनाबरोबरच त्यांनी गायी म्हशी पालन देखील सुरु केले.. हा जोडधंदा रोज चे ७० लिटर दूध आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रति लिटर ५० रुपये दराने विकले जाऊ लागले तसेच २ हजार प्रति किलो दराने तुपाची विक्री होऊ लागली..  
 गायी म्हशी च्या शेणापासून शेतीला पूरक अश्या शेणखताची निर्मिती झाली...



त्याचबरोबरीने सुरु केलेला आणखी एक जोडधंदा म्हणजे कडकनाथ कोंबडी पालन..
मध्यप्रदेशातून आणलेल्या २६ कोंबड्या व ३ कोंबडे यातून सुरु केलेला हा उद्योग आज ३०० कोंबड्यांवर येऊन पोहोचला आहे.. 
यातील २५% कोंबड्यांची विक्री करून पिल्लं व अंडी यांची ग्राहकांना थेट विक्री केली जाते.. व यातून देखील चांगला नफा उत्पन्न होतो..



याचबरोबरीने विजय यांनी ससेपालन देखील सुरु केले..  आणि आजच्या घडीला ३० ससे व १५ पिल्ले यांचा देखील व्यवसायात मोलाचा सहभाग आहे..!!



सुरुवातीला शेती व पूरक व्यवसायाच्या राखणीसाठी आणलेले श्वान देखील आज विजय यांच्या उत्पन्नात हातभार लावण्याचे काम करत आहेत.. 
विजय यांच्याकडे "रॉट वेलर", "जर्मन शेफर्ड" व "डॉबरमन" या जातीचे श्वान आहेत.. परिसरातील शेतकऱ्यांकडून श्वानाच्या पिल्लांची मागणी होऊ लागल्याने याचे हि संगोपन विजय यांनी सुरु केले आहे..



याच शेतीपूरक व्यवसायाला आता विजय यांनी आधुनिकतेची जोड देऊन अधिक सोयीस्कर केले आहे. या साठी त्यांनी CCTV कॅमेरे लावून सुरक्षितता व त्याच बरोबरीने ऍग्रो फार्म व्यवस्थापन काम सोपे केले आहे..
आज त्यांचे आई वडील घरबसल्या त्यांच्या फार्म मध्ये घडणाऱ्या घडामोडींवर बारकाईने लक्ष देतात..

आज विजय यांच्या या अत्याधुनिक "ऍग्रो फार्म" पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील शाळा, कॉलेजेस, कृषी विज्ञान केंद्र, सेवा संस्था.. आवर्जून भेट देतात...
त्यांनी केलेले ऍग्रो फार्म चे व्यवस्थापन, आज महाविद्यालये व परिसरात एक आदर्श उदाहरण निर्माण झालेले आहे....

अश्या आजच्या तरुण पिढी साठी आदर्श ठरणाऱ्या आणि "शेतीत आता काही दम नाही" अश्या नुसत्या पोकळ गप्पा मारणाऱ्या सुशिक्षित तरुणांसाठी श्री. विजय वाघ हे आज खऱ्या अर्थाने "ऍग्रो हिरो" ठरत आहेत..! 

त्यांच्या ह्या कार्यास भरभरून शुभेच्छा..!!

Tuesday, March 13, 2018

खांबाला कुठेतरी तडे जातायेत..


मागच्या आठवड्यात सगळ्यांची आवडती "चांदणी" अर्थात अभिनेत्री श्रीदेवी यांचं दुःखद निधन झालं..
आणि ठीक त्याच दिवशी भारत - पाक सीमेवर पाकिस्तान ने शस्त्रसंधी चे उल्लंघन करून भ्याड गोळीबार केला आणि त्यात आपले २ वीर जवान हुतात्मा झाले..

सगळ्यांची आवडती म्हणण्यामागचं कारण एवढंच कि आठवडा उलटल्यानंतर सुद्धा श्रीदेवी च्या मृत्यू च्या चर्चा अजून हि कायम आहेत.. आणि प्रत्येक जण यात काहींनाकाही योगदान देतोय...
आणि याच श्रेय जात ते आपल्या "लोकशाही चा चौथा खांब - प्रसार माध्यमं" यांना..
श्रीदेवी च्या मृत्यूच्या दुःखद घटनेचं प्रसार माध्यमांनी जे "सोहळ्यात" रूपांतर केलं त्याला खरंच काही तोडच नाही...

मग त्यात वेळो वेळी येणारी ब्रेकिंग न्यूज..
म्हणजे बोनी कपूर ने केलेला सरप्राईज डिनर प्लॅन..
त्यात अचानक झालेला, रहस्यमय असा श्रीदेवी चा मृत्यू..
नंतर आलेला पोस्टमार्टम रिपोर्ट..
आणि मग परत मृत्यू नेमका कसा झाला...? श्रीदेवी ला कोणी मारलं..? असे असंख्य प्रश्न
बोनी कपूर ची दुबई मध्ये होणारी चौकशी..
मुलीच्या चित्रपट प्रदर्शना आधीच घडलेला योगायोग..
अर्जुन कपूर चे डोळे हि "सावत्र आई" साठी पाणावले..
श्रीदेवी च पार्थिव दुबई वरून कधी येणार..
त्यासाठी अंबानींनी केलेली स्पेशल प्लेन ची व्यवस्था..
आणि अखेर पार्थिव विमानतळावर दाखल...
त्यात मग सुप्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर यांनी श्रीदेवी च्या पार्थिवाला "बॉडी" म्हणल्याने केलेला ट्विटर वार...
अनिल कपूर विमानतळावर पोहोचले..
त्यानंतर ऍम्ब्युलन्स चा पाठलाग करणाऱ्या प्रसारमाध्यमांच्या गाड्या....
सरते शेवटी पार्थिव घरी पोहोचले...
त्यानंतर सेलेब्रेटींची अंत्य दर्शनासाठी लागलेली रीघ...
मग सरकारी इतमामात होणार श्रीदेवी वर अंत्य संस्कार..
हे झाल्यावर असं वाटलं आता हे कुठं तरी थांबलं पाहिजे.. आणि थांबेल अशी अपेक्षा होती..
पण नाही... पुन्हा एक दिवस सगळ्या ठळक घटनांचा मागोवा घ्यायला आपले प्रसारमाध्यमं सरसावले नसते तर नवलच..

आपल्या ह्या लोकशाहीच्या चौथ्या खांबाने मग "श्रीदेवीच्या रहस्यमय रोमांचक १० घटना" ह्या मथळ्याखाली पुन्हा २ दिवस त्याची पारायणं सुरु केली...
खरंच हे पाहून मन अस्वस्थ होत होतं ..
त्यावेळी अशी जाणीव झाली कि राज्यासमोर, देशासमोर आणि जगासमोर भेडसावणारा सगळ्यात महत्वाचा आणि मोठा प्रश्न म्हणजे "श्रीदेवी"..
मग त्या घटनेने सगळं काही मागे पडलं..
सीमेवर होणार गोळीबार.. त्यात शहीद होणारे, मातृभूमीसाठी हौतात्म्य पत्करणारे - वीर सुपुत्र..
करोडो रुपयांचे झोल करून देशाबाहेर जाणारे "घोटाळेबाज"
आणि काही हजारांचे कर्ज फेडू न शकल्याने आत्महत्या करणारा आमचा अन्नदाता, गरीब शेतकरी "राजा"
मग त्यावेळी घरातला कर्ता पुरुष गमावल्यावर काळाचा आघात झेलणारे त्याचे कुटुंबीय..
सगळं, सगळं काही शून्य होतं ह्यापुढे...

ह्या दुःखद घटनेचे इतके लेटेस्ट अपडेट देऊन "सोहळ्यात" रूपांतर करण्याची गरज होती का.. ?
त्या ४ दिवसात खरंच बाकी काहीच महत्वाचं न्हवत.. ?
शेतकऱ्यांची होणारी कुचंबणा, सीमेवर होणारा गोळीबार, बँकामध्ये होणारे कोट्यवधींचे घोटाळे ह्या सगळ्यांपेक्षा "ह्या" ब्रेकिंग न्यूज अति महत्वाच्या होत्या का.. ?
खरंच सैनीकांच्या शहादत, अन्नदात्या शेतकऱ्याच्या आत्महत्त्या पेक्षा सेलिब्रेटी च मरणं इतकं महत्वाचं असावं... ?
शेवटी TRP च्या रस्सीखेचात आणि आपल्या बिजनेस च्या ग्रोथ मध्ये कशाला किती महत्व द्यावं हे हि समजू नये. ?
असे आणि अश्या अनेक प्रश्नांनी माझ्या मनात वादळ निर्माण झालं..
म्हणूनच अस वाटतंय कि "खांबाला कुठेतरी तडे जातायेत".. 

Monday, March 5, 2018

मेरी प्यारी "धकधक"

जब भी देखता था तुझे 
तो में मन हि मन मुस्कुराता था... 

तेरी धडकन सूनके हि तो
मेरा दिल भी धडकता था...

ना जाने कितने अरमान
दिल में लियें चलतां था..

जरूर कुछ तो बात हे तुज मे
जो मेरी निंद खो गई...

हमने दिल से दुवा मांगी  
और दुवा कबुल हो गई...!!




Tuesday, February 27, 2018

स्टॅन्ड अप


अनुभवी लोकांसाठी तसा नित्याचा, पण माझ्यासाठी प्रसंग तसा "बाका" (कठीण) च
नुकताच कॉलेज मधून पासआऊट झालेलो.. आणि अपेक्षे प्रमाणे, किंवा त्याहूनही अधिक चांगल्या MNC कंपनीत नोकरी मिळाल्याने…. 
"आज में उपर.. आसमाँ नीचे, आज में आगे... जमाना हे पीछे" या गाण्याला शोभेल असंच काहीतरी अनुभवत होतो..

ऑफिस मधला तो झगमगाट.. ते सगळ्यांचं पॉश राहणीमान हे सर्व पाहून भारावून तर गेलेलोच पण अश्या ठिकाणी काम करण्याची एक धास्ती देखील होती..
पण त्यातच दिवसांचा आठवडा म्हणल्यावर मग धास्ती सुद्धा दिवसांचीच... कारण नंतर दिवस आपण आपल्या मनाचा राजा होतो..

ऑफिस मध्ये सुरुवातीला दिसणारे अनोळखी चेहरे.. त्यांचा कामावर येतानाचा अति-उत्साह.. आणि नंतर तासाभराने (अर्थातच काम सुरु झाल्यावर) होणारा तो चेहऱ्याचा कायापालट म्हणजे जणू "हेमा मालिनी" "निरुपा रॉय" मध्ये होणारं ट्रान्सफॉर्मेशनच, आणि हे पाहताना सुरुवातीला फारच गम्मत वाटायची...

सगळं काही एकदम स्वप्नवत असंच होतं.. अगदी चित्रपटात दाखवतात ना तसंच..
चहा, कॉफी चे ते भारीतले मग हातात घेऊन, सकाळ सकाळी हेडलाईन्स वर चर्चा करणारे आणि नंतर मिटिंग साठी लगबगीने तयारी करणारे सहकारी..
कधीही वाट्टेल तेव्हा चहा/कॉफी घेऊ शकतो ह्या कल्पनेनेच चहाची तलभ निर्माण व्हायला लागली
(आणि ८ वर्षे झाली तरी आजतागायत ती कायम आहे)

दरवाज्यातून आत बाहेर करताना होणारं बायोमेट्रिक पंचिंग...

तेव्हा मला कळालं कि कुठेही जा, कितीही शिका.. आपल्याला अंगठ्याशिवाय काही पर्याय नाही..

हे सगळं झाल्यावर मग टीम ची ओळख करून देण्यात आली.. आणि त्यांनीच मला माझी "जागा" दाखवली..
तिथे आधीच असणारा कॉम्पुटर पाहिल्यावर, राहवून मी विचारलंच..  कि इथे कोणी दुसरी व्यक्ती बसते का.? त्यावर उत्तर आले कि नाही ती जागा माझ्यासाठीच आहे आणि तो कॉम्पुटर देखील माझ्यासाठीच तिथे मी येण्याअगोदर सेट केला आहे...
हे ऐकल्यावर तर डोळ्यात पाणीच यायचं राहील होतं.. माझी इतकी "काळजी" घेणारे लोक पाहून तर मी कृतकृत्य झाल्याची भावना मनात आली..

नंतर कॉम्पुटर चा पासवर्ड लिहिलेली स्टिकी नोट हाताशी घेऊन, पहिल्यांदा लॉगिन करून लगेच (त्या नवीन कोऱ्या मशीन चा) पासवर्ड बदलून टाकला..
(जणू त्या मशीन मध्ये खूप काहीतरी Confidential माहिती होती)
असो तशी खबरदारी घ्यायची सूचनाच Induction मध्ये दिली असल्याने पासवर्ड बदलल्यावर लगेचच मी स्वतःची पाठ थोपटून घेतली..
टीम मधल्या सहकाऱ्यांनी मग आमचे व्यवस्थापक (Manager) यांच्या ऑफिस ची सफर ते आत नसताना घडविली.
आणि मग मला "थोड्यावेळाने जाऊन आपण  त्यांना भेटून येऊ" असं सांगितलं..
झालं तर मग.! त्या वेळापासून माझी धडधड मला स्पष्ट ऐकू येऊ लागली.. लगेचच १० मिनिटात आम्ही त्यांच्या ऑफिस कडे जायला निघालो..
आम्ही टीम मध्ये एकूण जण.. त्यातले जण सुट्टीवर मग राहिलेले आम्ही तिघे तो गड सर करत चाललो होतो..
त्यात माझ्या मनात नाना विचार.
कि कसे असतील हे मॅनेजर.. कडक असतील का..? परत काही Interview घेतील का ? नेमकं आज पहिल्या दिवशी काय बोलतील ?
अश्या आणि अनेक प्रश्नांनी माझ्या मनात  प्रश्नांचं वारूळ निर्माण झालं होतं...
तोवर आम्ही त्यांच्या ऑफिस च्या दरवाज्याशी पोहचलो..
आम्हाला तिघांना पाहून त्यांनी एक "मनभरून स्मितहास्य" केलं आणि आम्हाला आत बोलावलं...
कोणी काही बोलायच्या आत त्यांनी "Good Morning Vinay. Welcome to our team. We were waiting for you since yesterday." असं म्हणून मला एक सुखद धक्काच दिला...
आणि नंतर खूप आपुलकीने माझ्याशी एक १०-१५  मिनिट निवांत गप्पाच मारल्या..  अगदी मित्राप्रमाणे...

त्यांच्या त्या बोलण्याने माझ्या मनातल्या सगळ्या शंका-कुशंका, भीती, दडपण एका क्षणात निघून गेलं.. आणि मन एकदम साफ झालं, अगदी त्या टाईड च्या जाहिरातीतल्या शुभ्र पट्ट्यासारखं...
दूसरा दिवस उजाडला... खूप उत्साहात म्हणजे मघाशी म्हणल्याप्रमाणे अगदी उत्साहातच मी सुद्धा ऑफिस ला पोहचलो..
चहा, नाश्ता आटोपला आणि थोड्याच वेळात म्हणजे शार्प १० वाजता.. मला आमच्या व्यवस्थापक (Manager) सरांचा पिंग (Message) आला -
Hi Vinay
Good Morning
यावर मी सुद्धा अगदी आनंदाने त्यांना ग्रीट केलं -
Very Good Morning Sir ...!!
त्यानंतर पुढचा मेसेज आला..
Stand-up
मी देखील लगेच "Okay" रिप्लाय देऊन, जागेवर ताड्कन उभा राहिलो...

आणि आजूबाजूला पाहून विचार करू लागलो कि सरांनी मला का बरं उभं राहायला सांगितलं असेल..
मग लक्ष्य गेलं कि माझ्या डोक्यावरच थोडस बाजूला एक कॅमेरा होता.. आणि मग वाटलं कि नक्कीच सर यातून मला बघत असतील...
आणि पुढे काहीतरी सूचना देतील..
मिनिट झाले मी तसाच स्थब्ध उभा होतो...
बोलताना या आधी आणि नंतर हि खूप सहज बोलून जातो मिनिट थांब रे. पण ती घड्याळाची मिनिटं मी त्या क्षणाला पूर्णतः अनुभवत होतो..
पुढच्या सूचनांची वाट पाहत.. कॅमेऱ्याकडे नजर फिरवत.. आजूबाजूला कोणी येऊन काहीतरी सूचना देईल ह्या अपेक्षेने...

अश्या मिनिटांच्या स्तब्धतेनंतर टीम मधील माझे एक सहकारी, व्यवस्थापकांच्या ऑफिस मधून डोकावले आणि त्यांनी आवाज देऊन मला बोलावून घेतले...
मग त्यांच्या ऑफिस मध्ये गेल्यावर मी घडलेला किस्सा सांगितलं कि मी त्यांच्या पुढच्या सुचनेसाठी वाट पाहत, "Stand Up" सांगितल्याप्रमाणे उभा होतो...
त्या नंतर सर्व जण जे हसण्यात गुंग झाले कि, पुढची दहा मिनिटं मला काही सुधरतच न्हवतं..
मग त्यांनी मला समजावून सांगितले कि "Stand-Up" म्हणजे दररोज होणारी मिटिंग ज्यात आपण काय काम करतो आहोत ह्या बद्दल ची माहिती टीम मध्ये सांगतो.
आणि हे ऐकल्यावर मग मला कळेनाच कि हसू कि रडू.. काहीच समजत न्हवतं...
ती घड्याळाची १२० सेकंद मी जे उभं राहून, कॅमेऱ्यात पाहून पुढच्या सूचनेची वाट पाहत होतो हे आठवून माझं मलाच हसू आवरत न्हवतं..

अश्या ह्या गमतीदार “Stand-up” चा किस्सा आजही आठवला कि चेहऱ्यावर हसू आल्या शिवाय रहात नाही..!


वरील घटना पूर्णपने "वास्तविक" असून याचा "काल्पनिक" गोष्टींशी तिळमात्र संबंध नाही...
असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा... :)

धन्यवाद.. 

#अभिमानास्पद

#अभिमानास्पद..! बहुप्रतीक्षित अश्या MBA फायनल इयर चा निकाल लागला आणि घरी सगळं वातावरण हर्षोल्हासात न्हाऊन निघालं..  कारणही तसंच, घरातील ...