Friday, March 23, 2018

ध्येयाने झपाटलेला माणूस..

आज तुमच्यासमोर आणतोय, कहाणी एका ध्येय वेड्या माणसाची.... 

हि गोष्ट आहे बुलढाणा जिल्ह्यातील, जळगाव जामोद तालुक्यातल्या काजेगाव मधील श्री. विजय वाघ यांची..!

विजय यांची काजेगाव मध्ये वडिलोपार्जित ८.५ एकर जमीन, ज्यातील बहुतांशी म्हणजे ७ एकर जिरायती आणि उर्वरित १.५ एकर बागायती जमीन.. 
वडील वीज कंपनीतून सेवानिवृत्त, भाऊ व्यवसायानिमित्त अमरावती ला स्थायिक.. व स्वतः विजय देखील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पुणे येथे नोकरीस.. 
दोन्ही मुले बाहेरगावी असल्यामुळे पारंपरिक शेती पद्धतीने सोयाबीन, उडीद, ज्वारी, तूर अश्या पिकांच्या लागवडीवर वडिलांचा भर होता. पण यातून फारच जेमतेम उत्त्पन्न हाती येत असे.. 

ह्या सगळ्या परिस्थितीकडे पाहून विजय यांनी निर्धार केला.. आणि हि स्थिती बदलायचं ठरवलं... 
पारंपरिक शेती करण्याबरोबरच त्यांनी शेतीपूरक व्यवसाय करायचं ठरवलं.. 
मग सुरु झाला तो अभ्यास.. बाजारपेठेचा पाठपुरावा करून त्यांनी शेती ला जोडधंदा विकसित करण्याची खूणगाठ मनाशी बांधली..

आणि हे सगळं सुरु करण्यासाठी आर्थिक भांडवल आवश्यक होत.. ते उभं करण्यात त्यांना साथ दिली ती त्यांची खंबीर पत्नी सौ. योगिता यांनी.. त्याच बरोबरीने त्यांचे मित्र देखील यासाठी धावून आले... 

त्यांची पत्नी सौ. योगिता यांचे योगदान फार अमूल्य आहे.. विजय यांच्या संकल्पनेतील ऍग्रो फार्म सत्यात उतरवताना ज्या अडचणी आल्या त्यावेळी योगिता यांनी कायम त्यांचं मनोधैर्य खचू न देण्याची काळजी घेतली आणि हे शिवधनुष्य लिलया पेलण्यास विजय यांना बळ दिले.. 

झालं तर मग.. सर्वप्रथम त्यांनी शेळीपालन सुरु करायचं ठरवलं.. 
विजय हे नोकरी निमित्त पुण्यात असल्याने आपल काम "उंटावरून शेळ्या हाकणे" ह्या उक्तीस बळी पडू नये ह्यासाठी गावी व्यवस्थापन करण्यासाठी श्री. सिद्धार्थ यांची मदत घेतली.. व दैनंदिन कामासाठी २ कायम स्वरूपी मजुरांची नेमणूक केली.. 
घराजवळील क्षेत्रामध्ये त्यांना अभियंते असलेल्या मोठ्या बंधूंचे सहकार्य लाभले..  त्यांनी उपलब्ध साहित्याच्या मदतीने शेळीपालनासाठी बंदिस्त गोठा बांधला.. 
त्यानंतर विजय यांनी परिसरातील स्थानिक जातीच्या २० शेळ्यांपासून ह्या व्यवसायास सुरुवात केली.. हळूहळू व्यवस्थापन करून त्यांनी या क्षेत्रातील मान्यवर मंडळींचं मार्गदर्शन घेऊन शेळ्यांची योग्य ती निगा राखली आणि पुढे जाऊन शेळ्यांची संख्या ७८  वर नेली... 
आजूबाजूचे गावकरी, व्यापारी यांनी गोठ्यात येऊन शेळ्यांची खरेदी करणे सुरु केले.. आणि पाहता पाहता गुणवत्तेनुसार शेळ्यांना ७५०० ते १२००० असा दर मिळू लागला...



शेळीपालनाबरोबरच त्यांनी गायी म्हशी पालन देखील सुरु केले.. हा जोडधंदा रोज चे ७० लिटर दूध आजूबाजूच्या परिसरामध्ये प्रति लिटर ५० रुपये दराने विकले जाऊ लागले तसेच २ हजार प्रति किलो दराने तुपाची विक्री होऊ लागली..  
 गायी म्हशी च्या शेणापासून शेतीला पूरक अश्या शेणखताची निर्मिती झाली...



त्याचबरोबरीने सुरु केलेला आणखी एक जोडधंदा म्हणजे कडकनाथ कोंबडी पालन..
मध्यप्रदेशातून आणलेल्या २६ कोंबड्या व ३ कोंबडे यातून सुरु केलेला हा उद्योग आज ३०० कोंबड्यांवर येऊन पोहोचला आहे.. 
यातील २५% कोंबड्यांची विक्री करून पिल्लं व अंडी यांची ग्राहकांना थेट विक्री केली जाते.. व यातून देखील चांगला नफा उत्पन्न होतो..



याचबरोबरीने विजय यांनी ससेपालन देखील सुरु केले..  आणि आजच्या घडीला ३० ससे व १५ पिल्ले यांचा देखील व्यवसायात मोलाचा सहभाग आहे..!!



सुरुवातीला शेती व पूरक व्यवसायाच्या राखणीसाठी आणलेले श्वान देखील आज विजय यांच्या उत्पन्नात हातभार लावण्याचे काम करत आहेत.. 
विजय यांच्याकडे "रॉट वेलर", "जर्मन शेफर्ड" व "डॉबरमन" या जातीचे श्वान आहेत.. परिसरातील शेतकऱ्यांकडून श्वानाच्या पिल्लांची मागणी होऊ लागल्याने याचे हि संगोपन विजय यांनी सुरु केले आहे..



याच शेतीपूरक व्यवसायाला आता विजय यांनी आधुनिकतेची जोड देऊन अधिक सोयीस्कर केले आहे. या साठी त्यांनी CCTV कॅमेरे लावून सुरक्षितता व त्याच बरोबरीने ऍग्रो फार्म व्यवस्थापन काम सोपे केले आहे..
आज त्यांचे आई वडील घरबसल्या त्यांच्या फार्म मध्ये घडणाऱ्या घडामोडींवर बारकाईने लक्ष देतात..

आज विजय यांच्या या अत्याधुनिक "ऍग्रो फार्म" पाहण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील शाळा, कॉलेजेस, कृषी विज्ञान केंद्र, सेवा संस्था.. आवर्जून भेट देतात...
त्यांनी केलेले ऍग्रो फार्म चे व्यवस्थापन, आज महाविद्यालये व परिसरात एक आदर्श उदाहरण निर्माण झालेले आहे....

अश्या आजच्या तरुण पिढी साठी आदर्श ठरणाऱ्या आणि "शेतीत आता काही दम नाही" अश्या नुसत्या पोकळ गप्पा मारणाऱ्या सुशिक्षित तरुणांसाठी श्री. विजय वाघ हे आज खऱ्या अर्थाने "ऍग्रो हिरो" ठरत आहेत..! 

त्यांच्या ह्या कार्यास भरभरून शुभेच्छा..!!

No comments:

Post a Comment

#अभिमानास्पद

#अभिमानास्पद..! बहुप्रतीक्षित अश्या MBA फायनल इयर चा निकाल लागला आणि घरी सगळं वातावरण हर्षोल्हासात न्हाऊन निघालं..  कारणही तसंच, घरातील ...